शब्दाचा विपर्यास करुन पालघर घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी टे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. यात ३ लोकांची हत्या करण्यात आली. ज्या परीसरामध्ये ही घटना घडली तो परिसर अत्यंत दुर्गम आहे. याठिकाणी रात्रीचं काही लोक येवून मुलांना पळवून नेतात अशी अफवा पसरली होती त्यातून ही घटना झाली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. मात्र ही घटना झाल्यानंतर ८ तासाच्या आत १०१ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक जण जंगलात पळून गेले होते. मात्र त्यांना शोधून काढलं. या १०१ आरोपींमध्ये एकसुद्धा मुस्लीम बांधव नव्हता, ही यादी मी सोशल मीडियात फिरवणार आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
तसेच घटनेच्या वेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता याचा अर्थ बस थांबवा असा होता. मात्र याचा उल्लेख शोएब बस असा करण्यात आला. आदिवासी भाषेत हे लोक बोलत होते. त्यामुळे शब्दाचा विपर्यास करुन याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाची लढाई लढत आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाशी लढतेय अशातच जातीचं राजकारण करण्याचा काही मंडळींना प्रयत्न केला तो दुर्दैवी आहे. पण काही जण या घटनेचे भांडवल करीत आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज