अन्... ना. जयंत पाटील झाले वाढपी.....
इस्लामपूर येथील 'कम्युनिटी किचन' ला दिल्या भेटी ; जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? गरजूंशी साधला संवाद
माणदेश एक्सप्रेस न्युज
इस्लामपूर : ज्यांच्या संकल्पना व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोर-गरिबांना गेल्या १५-२० दिवसापासून 'माणुसकीची थाळी' भरविली जात आहे, ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी शहरातील वेग-वेगळ्या भागातील 'कम्युनिटी किचन'ना भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत, काही केंद्रावर त्यांनी 'वाढप्या'ची भूमिका वठविली. यावेळी त्यांनी जीवाची पर्वा न करता राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुकही केले.
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ना.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५-२० दिवसा पासून शहराच्या वेग-वेगळ्या ९ भागात 'कम्युनिटी किचन' सुरू करून गरजूंना 'माणुसकीची थाळी' जेवू घातली जात आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या असंख्य नागरिक,व परराज्यातील मजुरांचे हाल सुरू झाल्याने ही किचन सुरू केली आहेत.
ना.पाटील यांनी आज (शनिवारी) आंबेडकर नगर, मंत्री कॉलनी, राजेबागेश्वर, मार्केट यार्ड, भाजी मंडई, घरकुल आदी भागातील कम्युनिटी किचनला भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील, नगरसेवक विश्वनाथ डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासो पाटील होते. याप्रसंगी ना.पाटील यांनी काही केंद्रावर स्वतः लोकांना जेवण वाढले. तसेच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत जेवणाच्या दर्जा, प्रमाणाबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली. यावेळी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गेल्या १५-२० दिवसापासून राबणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, व पदाधिकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष पै.भगवानराव पाटील, सुभाष सुर्यवंशी, नगरसेवक संग्राम पाटील, माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, कृष्णेचे संचालक संजय पाटील, शैलेश पाटील, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, पदवीधर सेलचे विशाल सुर्यवंशी, धीरज भोसले, विनायक सदावर्ते, हणमंत पाटील, पृथ्वीराज पाटील, सुहास पाटील, संदीप माने, बाळासो कोळेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस