पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले राज्यभर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसच्या संकटाची टांगती तलवार आहे. मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. अस्मानी सुलतानी संकटांना न डगमगता खंबीरपणे सामोरे जाणं हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती करत आपण कोरोनावर मात करणारच याची मला खात्री आहे. आज कोरोनाविरोधातील लढ्यात आपले मोलाचे योगदान देणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सुविधा पुरवणारा प्रत्येक व्यक्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयम ठेवत घरात राहणारे नागरिक यांच्या कर्तृत्वाची नक्कीच इतिहासात नोंद होईल. ही विषाणूच्या विरोधातील एक चळवळ आहे. आपण हा लढा 'संयुक्त'पणे, सर्व ताकदीने लढण्याचा निश्चय महाराष्ट्र दिनी करूयात. असे ते म्हणाले.
तसेच या संकटापेक्षा मोठे आर्थिक संकट पुढे आपली वाट पाहत आहे. मात्र त्या संकटावरही हा महाराष्ट्र मात करणार याचा मला विश्वास आहे. आपल्यावर आलेले हे संकट उलथून टाकून महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात अव्वल करण्यासाठी आपण सर्वांनीच शपथ घ्यावी. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस