युवक राष्ट्रवादी ’जय भवानी जय शिवाजी’ लिहिलेली 20 लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठवणार
मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा अभियान राबवून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेली दहा लाख पत्र पाठवणार आहे. आता भाजपयुवा मोर्च्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर देणार असून ‘जय भवानी जय शिवाजी‘ लिहून 20 लाख पोस्टकार्ड भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे.
शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर ’जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवली जाणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून 20 लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.
मेहबूब शेख म्हणाले की, ‘राज्यसभा खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, भाजपच्याच एका खासदाराने ’जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली. परंतु त्यावर राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना रोखलं. यावरुनच भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना दिसून आली. महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष भरलेला आहे हे दिसतं. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ’जय भवानी जय शिवाजी’ घोषणा लिहिलेलं पोस्टकार्ड व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा अन्यथा महाराष्ट्र त्यांना कदापि माफ करणार नाही.‘
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस