सबसे सस्ता, सबसे अच्छा', बिग बाजार रिलायन्स ग्रुपला विकला
मुबंई : देशात एक काळ असा होता की प्रत्येक मध्यम वर्गातील कुटुंब बिग बाजारच्या सेलची वाट पाहायचा. कारण या सेलमध्ये महत्त्वाच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळायची. 'सबसे सस्ता, सबसे अच्छा', कंपनीचे टॅगलाइनची घरा घरात पोहोचली होती. भारताचे रिटेल किंग अशी ओळख असलेल्या किशोर बियानी यांनी आता आपला पूर्ण व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपला विकला.
किशोर बियानी हे भारतातील एक यशस्वी उद्योगपती मानले जात होते. २०१९ पर्यंत त्यांचा व्यवसाय वेगाने वाढत होता. पण त्यानंतर बियानी यांच्या फ्यूचर ग्रुपवर आर्थिक संकट सुरू झाले. हे संकट तेव्हा अधिक गडद झाले जेव्हा फ्यूचर रिटेलला कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यानंतर बँकांनी कंपनीचे शेअर जब्त केले.२०१९ साली फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत किशोर बियानी ८० व्या स्थानावर होते. पण आता कर्ज फेडण्यासाठी त्यांना पूर्ण व्यवसाय २४ हजार ७१३ कोटींना विकावा लागला.
बियानी यांनी बिग बाजारची सुरुवात सबसे सस्ता, सबसे अच्छा या टॅगलाइनवर केली होती. बिग बाजारने एके काळी देशात अव्वल स्थान मिळवले होते. पण काही वर्षात रिटेल इंडस्ट्रीमधील हा सर्वात मोठा ब्रँड संकटात आला. बिग बाजारने रिटेल स्टोअरमध्ये सुरुवातीच्या काळात चांगला व्यवसाय केला होता. मात्र गेल्या काही वर्षात मंदीमुळे ग्राहकांची आवड बदलली. ऑनलाइन शॉपिंग आणि मॉल्समधील खरेदीबाबत पहिल्या सारखा ग्राहकांचा कल राहिला नाही. यामुळे फ्युचर ग्रुपला झटका बसला. एका बाजूला कंपनीचा व्यवसाय कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला कर्ज वाढत गेले. यामुळे बियानी यांचे बिग बाजार कर्जाच्या सापळ्यात अडकले. त्यानंतर करोना काळ फ्युचर ग्रुपसाठी मोठे संकट घेऊन आले.
डिसेंबर २०१९ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १५ टक्के घट झाली होती. याशिवाय महसूलात ३ टक्के घट झाली. त्यानंतर करोना संकटाने या समस्येने अधिक गंभीर रुप घेतले. रेटिंग एजेंसी ICRAने मार्च २०२० मध्ये फ्युचर ग्रुपचे रेटिंग नकारात्मक केले. कंपनीच्या कर्जात सातत्याने वाढ होत आहे. मार्च २०१९मध्ये १० हजार ९५१ कोटी असलेले कर्ज सप्टेंबर २०१९ पर्यंत १२ हजार ७७८ कोटीवर गेल्याचे ICRA म्हटले होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज