माणगंगा नदीला आला पुर
आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी:दुष्काळी नदी समजल्या जाणाऱ्या आटपाडी तालुक्यातील माण नदीला मोठा पूर आला असून तालुक्यातील आटपाडी-पिंपरी खुर्द व राजेवाडी-लिंगीवरे पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या ठिकाणी आटपाडी पोलिसांनी सुरक्षा कवच लावलेले आहेत.
आटपाडी तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी चांगला प्रमाणात पाऊस झाला आहे. आटपाडी शहरातून वाहत जाणारा शुक्र ओढा टेंभूच्या सुरु असलेल्या पाण्याने भरून वाहत असतानाच त्यात पावसाच्या पाण्याची भर पडली आहे. गेली २ दिवस झाला शुक्रओढा दुधडी भरून वाहत आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा तलाव असणाऱ्या राजेवाडीचा तलाव ही सलग दुसऱ्या पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने माण नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे तालुक्यातील राजेवाडी-लिंगीवरे येथील पुल पाण्याखाली गेला आहे.
आटपाडी व सांगोला तालुक्यांना जोडणारा महत्वाचा कौठुळी-लोटेवाडी पुल ही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद आहे. आटपाडी-पिंपरी खुर्द गावांना जोडणारा पुल ही पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद असून या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची ये-जा सुरु आहे.
एकंदरीत आटपाडी तालुक्यात यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी अनेक ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात ही सापडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.