शुक्र ओढ्यातील टेंभूच्या पाण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पूजन
आटपाडी/प्रतिनिधी : कृष्णा नदीच्या पुराचे वाया पाणी या वर्षी प्रथमच दुष्काळी आटपाडी तालुक्यात सोडण्यात आले. या पाण्याचे पूजन राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आटपाडीतील शुक्र ओढ्यावर करण्यात आले.
यावेळी खास. संजयकाका पाटील, आम. अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील, स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत (तात्या) पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.
सांगली जिल्हा कृष्णा नदी काठाला पावसाळ्यामुळे पूर येतो. त्यामुळे नदीकाठावरील संपूर्ण गावे पाण्यात जातात. सांगली-मिरज सह अनेक शहरात पुरामुळे मोठी हानी झाली आहे. त्यामुळे पुराचे पाणी पावसाळ्यात दुष्काळी भागात सोडण्याची मागणी अनेक वर्षे दुष्काळी जनता करीत होती. परंतु यावर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करून दुष्काळी भागात शेतीला पाणी उपलब्ध करून दिले. टेंभूचे पाणी आटपाडीच्या शुक्र ओढ्यातून वाहत आहे. त्या पाण्याचे पूजन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दुष्काळी जनतेच्या वतीने शासनाचे व मंत्री जयंत पाटील यांचे पाणी संघर्ष चळवळीचे नेते आनंदराव पाटील यांनी जाहीर आभार मानले.
आटपाडी तालुक्यात दरवर्षी गौरी गणपती उत्सव काळात पाऊस पडतो. परंतु अद्याप पाऊस झाला नाही. पावसाने ओढ दिली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत टेंभूचे पाणी तलाव, ओढे, बंधारे, नाले यात सोडण्यात आल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज