तहसिलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामुळेच आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण लागले वाढू ; आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांचा आरोप
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे तहसिलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अकार्यक्षमतेमुळेच आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने भयानक वाढू लागले आहेत व मृत्युचे प्रमाण वाढू लागले असल्याचा आरोप आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला आहे.
दिनांक २७ अखेर आटपाडी तालुक्यामध्ये तब्बल १४८१ कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे व त्यापैकी तब्बल २८ नागरीकांचा मृत्यु झाला आहे. तहसिलदार सचिन लंगुटे व तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. साधना पवार यांचे कुठलेही नियोजन नाही. आरोग्य विभाग व महसुल खात्यामध्ये एकमत नसल्यामुळे रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. महसुल खात्यातील व आरोग्य खात्यातील अधिकारी वर्ग आपली जबाबदारी एकमेकावर ढकलत आहेत, त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे व मृत्युचे प्रमाण वाढले आहे.
तहसिलदार यांचा महसलु खात्यातील कर्मचारी, आरोग्य विभाग तसेच पोलीस खात्यावर अजिबात नियंत्रण नाही. तहसिलदार सचिन लंगुटे यांची प्रशासकीय बदली मागील महिन्यात झाल्यामुळे तेव्हापासून ते निष्काळजी वागु लागले आहेत व बदलीचा आदेश निघालेपासून ते फक्त कागदोपत्री काम पुर्ण करीत आहेत व कागदोपत्री घोडे नाचवत आहेत. त्यामुळे तात्काळ त्यांना रिलीव करुन नवीन तहसिलदार येणे गरजेचे आहे. नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होईल याची गंभीर दखल खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर व आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेणे गरजेचे असल्याचे राजेंद्र खरात म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज