आटपाडी शहरात पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूचे पालन ; बाजारपेठ बंद
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात काल दिनांक ९ रोजी कडकडीत बाजारपेठ बंद ठेवून कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. आटपाडी शहरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ती रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी बैठक घेऊन लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील यांनी 11 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली.
बँक,पतसंस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालय, हॉस्पिटल व औषधे दुकाने वगळता काल जनता कर्फ्यू मध्ये सर्व जण सहभागी झाले त्यामुळे मुख्य बाजारपेठ दिवसभर बंद ठेवली. भाजी मार्केट, मटण दुकाने, किराणा दुकाने चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.
आटपाडी शहरात निवासी असणाऱ्या काही नेतेमंडळींना कोरोना झाला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परीषद तानाजीराव पाटील, शिवसेना युवक तालुकाध्यक्ष संतोष पुजारी, तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, वसंतदादा जिल्हा दूध संघाचे चेअरमन विष्णुपंत पाटील यांच्यासह खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना कोरोना झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आटपाडी तालुक्यात पदाधिकारी शासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आटपाडी पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आटपाडी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद ठेवून डाळिंब, फळ भाज्या लिलाव 5 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालपासून 11 दिवस आटपाडी शहरात जनता कर्फ्यू लागू केल्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी असे आवाहन ग्राम समितीने केली आहे.
आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असणारे शहर आहे. त्यामुळे आटपाडी शहरात तालुक्यातील सर्व गावांचा व्यवहार शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, बाजारपेठ आदीमुळे मोठी गर्दी होत होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटपाडीत शहरात झाल्याने झपाट्याने शहरात रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठ बंद ठेवली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज