Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट : अर्थमंत्री निर्मला सीतारामन


 


केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट : अर्थमंत्री निर्मला सीतारामन



नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सोमवारी सणासुदीची भेट जाहीर करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपयांचा ऍडव्हान्स आणि एलटीसी कॅश व्हाउचर्स देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली. 



एलटीसी कॅश व्हाउचर्स योजनेत कर्मचारी सुट्ट्यांच्या बदल्यात व्हाउचर्स घेऊ शकतात. या व्हाउचर्सचा वापर केवळ ज्या वस्तूंवर जीएसटी लागतो, अशा गैर खाद्य सामुग्रीची खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. सरकारी कर्मचारी सुट्ट्यांच्या बदल्यात रोख रक्कम घेण्याचा पर्याय निवडू शकतात. मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी दहा हजार रुपयांचा ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने चार प्रमुख निर्णय घेतले असून त्यात वरील निर्णयाशिवाय राज्यांना 50 वर्षासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या व पायाभूत सुविधा विकासाच्या कामासाठी आणखी 25 हजार रुपये अतिरिक्त खर्च करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. सरकारने घेतलेल्या या सर्व निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत 31 मार्च 2021 पर्यंत सुमारे 73 हजार कोटी रुपयांची मागणी निर्माण होईल, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला. सरकारप्रमाणे खाजगी क्षेत्रानेही आपल्या कर्मचाऱ्यांना सुविधा दिल्या तर मागणीत एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असे सीतारामन यांनी नमूद केले.



भांडवली खर्चासाठी राज्यांना 12 हजार कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज मिळणार आहे. हे कर्ज 50 वर्षे मुदतीचे असेल असे सांगून सीतारामन म्हणाल्या की, आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत व्यापक सुधारणा करण्यासाठी राज्यांसमोर 4 अटी ठेवण्यात आल्या आहेत. चारपैकी तीन अटी जी राज्ये पूर्ण करतील, त्यांना व्याजमुक्त कर्जाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन हजार कोटी रुपये दिले जातील. व्याजमुक्त कर्जाच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 मधील निधी राज्यांना 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावयाचा आहे. कर्जपैकी 50 टक्के निधी सुरुवातीला दिला जाणार असून पहिला निधी खर्च झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला निधी दिला जाईल.



कोरोना संकटातून अर्थव्यवस्था सावरत असून निर्मिती तसेच सेवा क्षेत्राची स्थिती दर्शवणारा पीएमआय निर्देशांक वाढला आहे. विजेच्या मागणीतही गेल्या काही काळात भरीव वाढ झाली असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. एलटीसी कॅश व्हाउचर्स आणि फेस्टिवल ऍडव्हान्स योजना सरकारने आणली आहे.



एलटीसीपोटी 5675 कोटी रुपये खर्च केले जाणार असून 1900 कोटी रुपये सार्वजनिक कंपन्या व सार्वजनिक बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत. एलटीसी कॅश व्हाउचर्स अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना रोख व्हाउचर्स मिळतील. मागणी आणि पुरवठ्यावर बोलताना सीतारामन यांनी पुरवठ्यातील अडथळे दूर झाले असले तरी मागणीत अजूनही हवी तशी वाढ झाली नसल्याचे स्पष्ट केले. 



रस्ते, संरक्षण, पाणीपुरवठा, नगरविकास तसेच देशात उत्पादित करण्यात आलेल्या भांडवली वस्तू आदींसाठी बजेटमध्ये 4.13 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यात आता 25 हजार कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies