बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई पोलिसांचा बंगळूरू पर्यंत तपास ; डिलिव्हरी बॉय चा बनून केली आरोपीला अटक
मुंबई : उत्तर प्रदेश येथील हाथरसमध्ये झालेल्या घटनेत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या तापसवर आणि वर्तनावर सर्व स्तरातून टीका होत आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी एक चांगली कामगिरी करत पोलीस कसा असावा याचे उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई पोलीस बंगळूरूमध्ये धडकली. अंधेरी येथील एका हेल्थ क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेशी आरोपी मोहम्मद शौकत याने सोशल मीडियाद्वारे मैत्री केली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्नाचे आमिष दाखवून मोहमद शौकत याने या महिलेवर बलात्कार केला.
आरोपी मोहम्मद शौकत महिलेच्या घरच्यांनाही भेटला. त्यांचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचं निश्चित केलं. मात्र, मोहम्मदच्या मनात काही तरी वेगळंच चाललं होतं. महिलेशी लग्न न करता फक्त फायदा उचलायचा हा मनसुबा मोहम्मद शौकतचा होता. एवढचं नाही तर लग्न करण्यासाठी शौकतने 5 लाख रुपये सुद्धा मागितले जे त्याला मिळाले. मात्र, लग्नाचं आमिष ते आमिषच राहील. शेवटचा पर्याय म्हणून पीडित महिलेने जे.जे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
प्रकरणाची गंभीर दखल घेत जे.जे मार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आणि मोहम्मद शौकतचा ठाव ठिकाणा शोधण्यास सुरु केलं. शौकत हा बेंगळुरूमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांचं पथक शौकातला अटक करण्यासाठी बंगळूरुमध्ये दाखल झालं. आरोपी इथे एका उच्चभ्रू इमारतीमध्ये एका महिलेसोबत राहत होता. शौकत जेवणासाठी ऑनलाईन अॅपद्वारे जेवण मागवत होता. पोलीस शौकतला पकडण्यासाठी चक्क डिलिव्हरी बॉय बनले. पोलिसांना पाहताच शौकतची सळो-की-पळो अशी अवस्था झाली. मात्र, मुंबई पोलिसांच्या हाती तो लागलाच.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला घेऊन गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. त्यांच्या तपासावर शंका निर्माण करण्यात आली. मात्र, ज्या मार्गाने मुंबई पोलीस तपास करत होते, तो योग्य होता. त्यानुसार सुशांत मृत्यू संदर्भात एम्सच्या रिपोर्टने शिक्कामोर्तब केलं आहे. पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सानप, सहायक पोलीस निरीक्षक फरीद खान, अमलदार राऊत, ठाकूर, विंचू आणि बोंब या पथकाने ही कामगिरी बजावली आहे. मुंबई पोलिसांना जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात सक्षम पोलीस दल का म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी समोर ठेवलं असून मुंबई पोलिसांच्या या कामगिरी बाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज