जमिनीच्या वादातून वकिलाचा अपहरण करून खून ; तीन आरोपी अटकेत
पुणे : वकिलाचा अपहरण करून खून केल्याची घटना पुणे येथे घडली असून याप्रकरणी तीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून सदर वकीलाच अपहरण करण्यात आले होते.
पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून 1 ऑक्टोबर रोजी उमेश चंद्रकांत मोरे हे बेपत्ता झाले होते. या प्रकरणी कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या घटनेचा तपास करण्यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर उमेश यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली होती.
या चौकशी दरम्यान पोलिसांना ताम्हीणी घाटात त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. तेथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी कपिल विलास फलके (वय 34 चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28 बीड) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32 मार्केट यार्ड पुणे) या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची अधिक चौकशी केली असता जमिनीच्या वादातून खून केल्याचे सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज