ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश शेंडगे
मुंबई : "ज्या दिवशी कायदा पास झाला तेव्हा यांनी जल्लोष केला, आणि आता त्याच कायद्याला विरोध करीत आहेत. हे चुकीचं आहे. मराठा समाजाचे नेते वातावरण बिघडवण्याचं काम करीत आहेत," असा आरोप ओबीसी समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज केला. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शेंडगे यांनी हा आरोप केला आहे. येत्या तीन तारखेला तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे."मराठा समाजाला आरक्षण मिळेल, यासाठी सहा वर्षांपासुन ते वाट पाहत आहेत, हजारों विद्यार्थ्यांचे यामुळे आयुष्य उद्धवस्त होत आहे, १३ टक्के जागेसाठी ८७ टक्के जागा सडवल्यात हे शहाणपण कुठलं ? असा प्रश्न प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आहे.
"मराठा आरक्षणामुळे ११ वीचे प्रवेश थांबले आहेत, १२ वीचे प्रवेश थांबवले आहेत. ओबीसीसमोर आता आंदोलनाशिवाय कुठलाच पर्याय नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना जर आरक्षण द्या, अशा प्रकारचे कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारीत करू नये, नाहीतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, " असा इशारा शेंडगे यांनी यावेळी दिला आहे. मराठा आरक्षणामुळे पोलिस भरती थांबली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाच्या एकाही प्रश्नावर निर्णय घेण्यात आला नाही, असे शेंडगे यांनी स्पष्ट केलं.
प्रकाश शेंडगे म्हणाले की आमदार, मंत्री यांनी फक्त मराठा समाजाची बाजू लावून न धरता त्यांनी सर्व समाजाची बाजू लावून धरायला हवी. सरकार दोन समाजात भांडण लावण्याचं काम करते आहे. ओबीसीचा ताटातील आरक्षण आम्ही देणार नाही. ओबीसींनी रस्त्यावर भिख मागायची का..? मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले तर एकाही मंत्र्यांना ओबीसी समाज महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज