ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित राखण्यास राज्य सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर राज्यात सर्वत्र आंदोलन चालू असताना ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित राखण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे उपसमितीची स्थापना केली, त्याचप्रमाणे ही उपसमिती स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. टप्प्याटप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज