दौऱ्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा : राजू शेट्टी
सांगली : नुसते दौरे करून काय साध्य होणार आहे, त्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली असून केंद्र सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी व मदतीसाठी एनडीआरएफ पथक पाठवावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेतली.
अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 75 व 25 टक्के तातडीने मदत केली पाहिजे. केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असे म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याआधी राज्यात अवकाळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पाहणी करत भरीव मदतीची घोषणा केली होती.
आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी तातडीने मदत जाहीर केली पाहिजे. तसेच शेती नुकसानीबाबत दौरे करून काही होणार नाही, त्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज
Join Free Telegram माणदेश एक्सप्रेस पेज