ठाणे : वीजबिलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलनं शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली.
ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. मात्र जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. मनसेसोबतच स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही सरकारला इशारा दिला आहे. 'आम्ही वीजबिल भरणार नाही, सक्तीची वसुली करून बघा, जशास तसं उत्तर देऊ', अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही नितीन राऊत यांच्या भूमिकेवर 'अजब सरकारचा गजब यू टर्न', असं ट्विट करत टीका केली आहे. तर ठाणे-पालघर जिल्ह्यात कोणताही अधिकारी बळजबरीने वीजबिल घेण्यासाठी अथवा मीटर कापण्यासाठी आला तर मनसेचे कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि याची पूर्ण जबाबदारी एमएसइबीच्या अधिकाऱ्यांची असेल, असा इशारा मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला आहे.