पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बिहारी जनतेला भावनिक साद घातली आहे. 'ही माझी शेवटची निवडणूक आहे', असे भावनिक आवाहन नितीश यांनी केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज पूर्णिया येथील जाहीर सभेला संबोधित करत होते. 'निवडणूक प्रचाराचा आज शेवट होणार आहे. परवा मतदान होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला', अशा शब्दांत नितीश यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
नितीश यांनी १९७७ साली आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी नालंदाच्या हरनौत येथून राजकारणात प्रवेश केला होता. नितीश यांनी या मतदारसंघातून चारवेळा निवडणूक लढवली होती. यात त्यांना १९७७ आणि १९८० साली पराभव स्वीकारावा लागला होता.
बिहारमध्ये २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ नोव्हेंबरला ७१ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी मतदान झाले. याबरोबरच शेवटच्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघात मतदान होईल. या निवडणुकीत, राजद हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजप आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस