काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बरोबरच : राजाराम देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या काँग्रेसच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. याच आंदोलनातील एक भाग म्हणून सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून तब्बल ६५ लाखांपेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी सह्या करून या मोहिमेत सहभाग नोंदवला. सांगली जिल्हयातून दोन लाख दहा हजार स्वाक्षरी मोहिम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी दिली.
काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पक्ष प्रभारी एच. के. पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वाक्षरी दत्पर दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे प्रत्येक राज्यातून आलेल्या स्वाक्षरी देणार आहेत. राजाराम देशमुख म्हणाले, जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी २ कोटी सह्यांची मोहिम राबवण्याचे निश्चित केले होते. २ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले. हे कायदे शेतकऱ्यांना कसे उद्धवस्त करणारे आहेत याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवनवर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले आणि महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजपा सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला. या महामेळाव्यात राज्यातील १० हजार गाव खेड्यातील ५० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावतीसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ट्रॅक्टर रॅली काढून विरोध दर्शवला. या दरम्यान सह्यांची मोहिमही राबवण्यात आली. काँग्रेसचा या कायद्याविरोधात संघर्ष सुरु असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहील.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस