मुंबई : लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच दिवाळीच्या आधीच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होण्यास सुरूवात झाली होती. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राज्य सरकार दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचारही राज्य सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्य सरकार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश महाराष्ट्र सरकारकडून लवकरच काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत मागील २४ तासात तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २८ ऑक्टोबरपासून दिल्लीत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसा ५००० हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येनं ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील आठवड्यात दोन हजार ते तीन हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. मागील दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येनं उसळी घेतली आहे. १८ नोव्हेंबर रोजी राज्यात ५ हजार रुग्ण आढळून आले. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजीही ५ हजार ५३५ रुग्ण आढळून आले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज