फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणार : यशदा संचालक आनंदराव पुसावळे
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : तालुक्यातील कृषी पदवीधर एकत्र येऊन या भागातील शेतकऱ्यांसाठी फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार, यशदा पुणेचे संचालक आनंदराव पुसावळे यांनी व्यक्त केला. आटपाडी येथे सालाबाद प्रमाणे आयोजित कृषी पदवीधर मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांनी आता विषमुक्त शेती करण्याला विशेष प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे येणारी पिढी ही रोगमुक्त व व्याधीमुक्त होईल. शेतीतून आजाराचा प्रसार होत असेल तर ते घातक आहे. या परिसरातील युवक शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीत करिअर करत असताना मानवतेची जाण ठेवणे गरजेचे आहे.
आटपाडी येथे दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या पाडव्यादिवशी कृषी पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही कोरोना आजाराचे नियम पाळून सदर आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या मेळाव्यास पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने या मेळाव्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. यावेळी कृषी पदवीधर ॲड. धनंजय पाटील, प्रसाद देशपांडे, गुलाबराव पाटील, प्रशांत पाटील व विक्रीकर निरीक्षक विनीत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.
तहसीलदार निलप्रसाद चव्हाण म्हणाले की, वर्षातून एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच कृषी पदवीधर एकत्र येतात त्यामुळे एक वेगळा आनंद मिळतो. वेगळ्या विचारांची देवाण-घेवाण होते. नेहमीच अधिकाऱ्यांचे चाकोरीबद्ध जीवन असते. या कार्यक्रमामध्ये गावाकडच्या विविध विषयांची व विचारांची देवाणघेवाण होते व औपचारिकता सोडून मैत्रिपूर्ण संबंधाच्या क्षणाचा आनंद घेता येतो. इतर पदवीधरापेक्षा एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कृषी पदवीधरा मध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावना अधिक असते असे ते म्हणाले.
प्रमुख वक्ते म्हणून शेतीतज्ञ एन. डी. पाटील पिलिवकर यांनी शेती उद्योजकता या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले, तर तहसीलदार विक्रमसिंह शिंदे, तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण, प्रा. प्रकाश लोखंडे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, मंडल अधिकारी सचिन ढेरे, रवींद्र घुटूकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रा.डॉ.बी.जे.देशमुख, प्रा.संग्राम ढेरे, विस्तार अधिकारी शंतनू राक्षे, वैभव पाटील, नेताजी पाटील, प्रवीण पाटील, अशोक राऊत, शेती अधिकारी भाऊसाहेब कदम, कमलेश घोडके, तुकाराम माने, राजेंद्र मेटकरी, गोरख जरे, शिवाजी सूर्यवंशी, सूर्यकांत देशमुख, कालिदास गाढवे, सेवानिवृत्त प्राध्यापक संभाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी तसेच बरेच नवीन कृषी पदवीधर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ॲडधनंजय पाटील, सूत्रसंचालन श्रेयश पाटील तर आभार प्रसाद देशपांडे यांनी मानले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस