उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लॉकडाउनसंबंधी महत्वाचे विधान
पंढरपूर : राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील यावेळी लाट नाही तर त्सुनामी येईल अशी भीती व्यक्त केली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असं ते म्हणाले आहेत. “गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचं सांगितलं.
“अवघ्या जगासमोर करोनाचं आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचं आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज