मुंबई : भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला होता. दरम्यान, भाजपांही यावर प्रत्युत्तर देत भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला असं म्हणत टीकेचा बाण सोडला आहे.
“१०५ हुतात्म्यांवर ज्यांनी गोळीबार केला, कसाबला ज्यांनी बिर्याणी खायला घातली, याकुबच्या फाशीला ज्यांनी विरोध केला, ज्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार करुन महाराष्ट्र लुटला त्यांच्या सोबत सत्तेत बसलात तेव्हाच “भगव्याचा” रंग तुम्हीच फिका केलात. भगवा तर तुम्हीच हाताने उतरवलात,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.
“भ्रष्टाचाराला कंटाळून आता मुंबईकरच आता महापालिकेवर पारदर्शक कारभाराची, विकासाची गुढी उभारतील. गुढीला ‘शुद्ध भगव्याची’ झालर चढवतील. तुम्ही अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा. मुंबईकरांना चॅलेंज देताय मुंबईकरच आता करुन दाखवतील,” असंही ते म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज