आटपाडी उत्तरेश्वर देवस्थानची कार्तिकी यात्रा कोरोनामुळे रद्द ; मात्र शेळ्या-मेंढ्यांचा बाजारामध्ये खरेदी विक्री होणार
आटपाडी/प्रतिनिधी : माणदेशातील आटपाडी येथे भरलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात पाच लाख रुपये पर्यंत बकऱ्यांच्या किमती होत्या. आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा पौर्णिमे पासून सुरु झाली आहे. कार्तिक महिन्यात भरणारी ही यात्रा दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांचा बाजारामध्ये खरेदी विक्री होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेळ्या मेंढ्यांची खरेदी विक्रीचे व्यवहार कालपासून सुरू झाले आहेत. आटपाडी शनिवारचा आठवडा बाजार काल भरला होता त्यावेळेस महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून ही शेतकरी व्यापारी दलाल मेंढपाळ वाहनचालक यांनी आटपाडी त गर्दी केली होती. कालपासून त्यांचे व्यवहार सुरू झाले आहेत तर उद्यापर्यंत बाजार चालणार आहे.
मासाळवाडी येथील धोंडीराम तुकाराम सरगर यांच्या बकऱ्याची किंमत पाच लाख रुपये तर धनाजी लेना गाढवे माडग्याळ ता. जत यांच्या बकऱ्याची किंमत 50000 होती. आटपाडी ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत हाके यांच्याही बकऱ्याची किंमत 75 हजार एवढी होती. शिवाजी विठोबा हाके राहणार हाके वस्ती यांच्याही बकऱ्यांच्या कळपाच्या किमती तेजीत होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार समिती आवारात पाणी स्वच्छता सॅनिटायझर विजेची सोय तसेच मास्क आदींची सोय शेतकऱ्यांसाठी केली होती, अशी माहिती सचिव शशिकांत जाधव यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या भितीमुळे आटपाडीची कार्तिकी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, परंतु पशुपालकांची सोय व्हावी म्हणून फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरवला आहे. या बाजारात तीन दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे. मेंढपाळांनी मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे चाऱ्याची उपलब्धता असल्यामुळे शेळ्यामेंढ्या पाळण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थान बाजार पटांगणात आहे. परंतु यावर्षी गर्दी होऊ नये म्हणून शेळ्या-मेंढ्यांचा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवला आहे. त्यामुळे शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करणारी चार-पाचशे वाहने ट्रक टेम्पो यांची वाहतूक करीत आहेत. माणदेशातील आटपाडीची यात्रेपासून महाराष्ट्रातील सर्व यात्रांची सुरवात होत असते त्यामुळे ही यात्रा कशी भरणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांना स्टॉल मांडण्यासाठी परवानगी मिळालेली नाही आटपाडी यात्रा महोत्सव भरविला जाणार नाही त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल नाही. फक्त शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरु ठेवल्यामुळे मेंढपाळ व शेतकऱ्यांची सोय झाली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज