“यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी” : राजेश टोपे
मुंबई: आता इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातदेखील यंदाच्या दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले आहेत. कारण कमी झालेला कोरोना संसर्ग पुन्हा एकदा थंडीच्या लाटेप्रमाणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वायू प्रदूषणात वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम कोरोना रुग्णांवर होतो. त्यामुळे आरोग्य विभाग फटाकेमुक्त दिवाळीसाठी आग्रही आहे. प्रदूषण वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होतो. कोरोनाचा आजार थेट श्वासाशीच संबंधित असल्यानं यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. याबद्दलचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.
फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळेच आरोग्य विभागानं याबद्दलचा प्रस्ताव तयार केला आहे. तो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास यंदा राज्यात फटाके विक्रीवर बंदी असेल.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्ससोबत फटाकेमुक्त दिवाळीबद्दल चर्चा सुरू आहे. यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी, यासाठी राजेश टोपे प्रयत्नशील आहेत. तसे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत. 'दिवाळीचा सण जवळ आला आहे. कोरोनाचं संकट असल्यानं यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कशी करता येईल, याचा विचार आपण करायला हवा. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाकडे आग्रह धरणार आहे,' असं टोपे म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज