शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे पदवीधरांचा काय विकास करणार? मंत्री जयंत पाटील यांची भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर टिका
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर सडकून टीका केली. ज्या लोकांनी शेतकऱ्यांची पैसे बुडवले, सहकारी साखर कारखाने हे खासगी केले, असे लोक आता या पदवीधरांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला डोस पाजत आहेत. आता हे लोक पदवीधरांचे प्रश्न काय सोडवणार, अशी टीका नाव न घेता भाजपाचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यावर मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
सांगलीमध्ये आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा संयुक्तिक महामेळावा सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच काँग्रेसचे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांचा पदाधिकारी व पदवीधर कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपा आरएसएसचा वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. पण आपल्यातील काही तिकडे गेले आहेत. त्यामुळे आपल्या पेक्षा वेगळी पध्दत असणार नाही, असे मत व्यक्त करत भाजपाकडून पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या या निवडणुकीत बुद्धीभेद करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये बुद्धिभेदाला बळी पडू नये. अफवा पसरवणे हा त्यांचा छंदच आहे, अशी टीकाही मंत्री जयंत पाटलांनी केली आहे. भाजपाने देशावर चुकीची आर्थिक धोरणे लादली. आज पदवीधरांच्या समोर प्रश्न अवघड झाले आहेत. कोरोना स्थिती मुळे हे झाले नसून मागच्या जून-जुलै पासून हे सुरू झाले आहे,कारण देशातील सत्तेत असलेल्या भाजपाने चुकीच्या दिशेने धोरण घेतली,त्यामुळे गेल्या ४५ वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी कोणत्या वर्षात निर्माण झाली असेल तर ती मागील वर्षात निर्माण झाली आहे. आणि पदवीधरांच्या समोर प्रश्न निर्माण करणारा पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे भाजपा आहे. आणि आर्थिक स्थिती अडचणीत आणण्याचे आणि देशात चुकीचे आर्थिक धोरण स्वीकारनाचे काम भाजपाने केले असल्याचा,आरोपही यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, प्राध्यापक भरतीला स्थगिती दिली असल्याचा खोटा प्रचार भाजपकडून सुरू आहे. मात्र तसा कोणताही प्रकार झाला नाही. आचार संहिता संपल्यावर प्राध्यापक भरती होणार आहे, सातवा वेतनाबाबत ही भाजप श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस