मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा पंढरपूरहून मुंबईकडे
पंढरपूर : मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आज श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीपासून दर्शन घेऊन पायी दिंडी - आक्रोश मोर्चा मंत्रालय मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, आक्रोश मोर्चाला हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने मंदिर परिसरात संचारबंदी आदेश लागू करून पंढरपूर शहरात जमाबंदी आदेश लागू केले आहेत. शिवाय प्रवासी बस वाहतूक बंद करून मराठा समाजाची मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप करत मराठा संघटना मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
पंढरपूर येथून मराठा समाजाचा पायी दिंडी-आक्रोश मोर्चा मंत्रालय मुंबईकडे निघणार आहे. या आक्रोश मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मोर्चाच्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ नये म्हणून मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्गावर संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करु नये, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
आंदोलकांनी शांततेच्या, लोकशाही मार्गाने सोशल डिस्टन्स पाळून आंदोलन करण्यात येईल, याची खात्री दिली. मात्र संचारबंदी मागे घेण्याची आंदोलकांची मागणी मान्य न करण्यात आल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलनकर्ते आक्रमक झाले. कितीही दडपशाही करा, आम्ही आक्रोश मोर्चा काढणारच, अशी ठाम भूमिका मराठा समाजाच्या संघटनांनी घेतली आहे.
त्यामुळे आज, शनिवारी निघणार्याी पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी-आक्रोश मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे व जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर दोनपेक्षा अधिक लोकांना मंदिर परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलिस प्रशासनानेही आक्रोश मोर्चाच्या धास्तीने बंदोबस्त वाढवला आहे. सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांवर तपासणी करण्यात येत आहे.आंदोलक मोठ्या संख्येने जमू नयेत म्हणून पंढरपूरला येणारी व पंढरपूर येथून बाहेर जाणारी बससेवा बंद करण्यात आली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज