“तर त्यांना स्मशानभूमीत पाठवलं जाईल,” : भाजपा नेत्याची तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकी
कोलकता : भाजपानं पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मागील काही वर्षांपासून भाजपानं बंगालमध्ये पक्ष विस्ताराचं काम हाती घेतलं. त्याचे काही परिणाम मागील काही निवडणुकींमध्ये दिसूनही आले. मात्र, यात आता भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात भाजपानं तृणमूलवर आरोप केले होते. अशातच भाजपाच्या नेत्यानं तृणमूलच्या कार्यकर्त्यांना थेट स्मशानात पाठवण्याचीच धमकी दिली आहे.
दरम्यान, भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी एका सभेत तृणमूलच्या कार्यकर्त्यांना जिवे मारण्याचीच धमकी दिली. पश्चिम बंगालमध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होण्यासाठी केंद्र सरकार काळजी घेईल. विधानसभा निवडणुकीत राज्य पोलीस नव्हे, तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्था असेल,” असं त्यांनी सांगितलं.
“मी ममता दीदीच्या कार्यकर्त्यांना सांगतो, जे वाईट गोष्टी करत आहेत. त्यांनी ६ महिन्यात स्वतःमध्ये बदल करावेत, नाहीतर त्यांचे हात, पाय आणि डोके फुटतील. घरी जाण्याआधी तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल. जर त्यांनी जास्त त्रास दिला, तर त्यांना स्मशानभूमीत पाठवलं जाईल,” असा इशारा देत घोष यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज