“शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं” : देवेंद्र फडणवीस
पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कृषी कायद्यांवरुन मोदी सरकारची बाजू मांडताना ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सरकारमध्ये शेतकऱ्यासंदर्भात बोलणारं कोणी नाही. शेतकऱ्याचा विचार कऱणारं कोणी नाही. पाच वर्ष सातत्याने आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय़ घेतले. अतिवृष्टी, दुष्काळ, पीक रोग प्रत्येकासाठी आम्ही पैसा दिला. शेतकऱ्यावर जेव्हा कधी संकट आलं तेव्हा आम्ही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. पण आज सरकार शेतकऱ्यांकडे ढुंकून पहायला तयार नाही. शेतकऱ्याचा साधा विचारही केला जात नाही,” अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या घोषणा करत शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते. तिथे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान होतंय आणि कमी पैसे देताय असं सांगत ५० हजार रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे असं जाहीर केलं. कोरवाहू आहेत त्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यायचं सांगितलं. आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले. म्हणाले उद्धव ठाकरे तुम्ही ५० हजार म्हणता…बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण कसले दीड लाख आणि ५० हजार रुपये….राजा उदार नाही तर उधार झाला आणि हाती भोपळा आला अशी परिस्थिती आहे”.
“आमच्या शेतकऱ्यांना सहा आणि आठ हजार रुपये घोषित केले आणि तेदेखील पोहोचले नाही. शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे,” असा संताप फडणवीसांनी व्यक्त केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज