‘ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही,’ : बसपाच्या या नेत्याचा खळबळजनक दावा
उत्तर प्रदेश : जगातील शास्त्रज्ञ गेल्या काही महिन्यांपासून जे औषध तयार करण्यासाठी अक्षरश: युद्धपातळीवर काम करत आहेत, ते औषध सापडल्याचा दावा एका राजकीय नेत्यानं केला आहे. त्यांनी ‘ताडी प्यायल्याने कोरोना होत नाही,’ असा दावा त्यांनी केला आहे. भीम राजभर असे या राजकीय नेत्याचे नाव असून ते बहुजन समाज पार्टीचे उत्तर प्रदेश अध्यक्ष आहेत.
भीम राजभर यांची एका कार्यक्रमात बोलताना जीभ चांगलीच घसरली. त्यांनी सुरुवातीला ताडीची तुलना गंगा नदीच्या पाण्याशी केली.ताडी गंगाजलपेक्षा शुद्ध असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. राजभर एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘ताडाचं झाड हे जगातील हे प्राचीन झाड आहे. राजभर समाज ताडीच्या उद्योगातूनच आपले उदरभरण करतो. ताडी प्यायल्याने शरिरातील प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कोरोना होत नाही,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
राजभर हे उत्तर प्रदेश बसपा अध्यक्ष झाल्याबद्दल बलियामध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांचे ताडी प्रेम ओसंडून वाहत होते. “कोरोनापासून बचाव करायचा असेल तर ताडी प्या. ताडी प्यायल्यानंतर कोरोना होत नाही. ताडी कोरोनावर मात करते. आज राजभर समाज ताडीमुळे अनेक अडचणीनंतरही तग धरुन आहे,’’ असा दावा त्यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज