“शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रश्न चर्चेने सोडवतील, त्यात इतरांनी नाक खुपसू नये” : सनी देओल
गुरुदासपूर : शेतकऱ्यांच्या संघर्षांच्या आडून आपले हेतू साधून घेण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि विख्यात अभिनेते सनी देओल यांनी केला आहे. शेतकरी आणि सरकार त्यांच्यातील प्रश्न चर्चेने सोडवतील. त्यात इतरांनी नाक खुपसू नये, असेही ते म्हणाले.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करीत आले आहे. आपण आपल्या पक्षाबरोबर आहोत. शेतकऱ्यांबरोबर आहोत आणि कायम शेतकऱ्यांबरोबर राहू, असेही देओल यांनी स्पष्ट केले. नव्या कृषिकायद्यांबाबत शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये असलेल्या मतभेदातून तेच दोघे चर्चेने मार्ग काढतील. इतरांनी त्यामध्ये पडून अडचणी वाढवू नयेत. असे करणाऱ्यांना वास्तविक शेतकऱ्यांशी काही देणेघेणे नाही तर त्यांना त्यातून आपला स्वार्थ साधून घेण्याचा हेतू असल्याची शक्यता आहे, असे देओल यांनी म्हंटले आहे.
अभिनेता आणि कार्यकर्ता दीप सिद्धू याच्याशी आणि त्याच्या कारवायांशी आपला काहीही संबंध नसल्याचे देओल यांनी स्पष्ट केले. शेतकरी आंदोलनामध्ये खलिस्तानचे समर्थन करताना दीप कॅमेऱ्यात बंद झाला आहे. निवडणुकीच्या काळात तो आपल्या बरोबर होता. त्यानंतर दीर्घकाळापासून तो आपल्या संपर्कात नाही. त्याच्या कारवायांबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज