ब्रिटनमधील कोरोना उद्रेक पाहता भारतात “हा” निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू
नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून येताच युरोपातील अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आणखी काही मुख्यमंत्री आणि नेत्यांनी ब्रिटनहून येणारी विमानं रोखा, असं आवाहन केंद्राला केलं होतं. त्यानंतर आता ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल. त्यापूर्वी भारतात येणाऱ्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य असेल.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती लक्षात घेता युरोपमधून भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात अलर्ट जारी करण्यात आला असून घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आलं आहे.