महिलाच ब्रेकअपनंतर बलात्काराचे गुन्हे दाखल करतात : छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षांनी उधाळली मुक्ताफळे
छत्तीसगढ : बऱ्याच महिला व मुली स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात अशी मुक्ताफळे उधाळली आहेत छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
छत्तीसगढमधील बिलासपूर येथे महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर बोलताना नायक यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. छत्तीसगढ महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक म्हणाल्या की, "अनेक प्रकरणांमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आणि सहमतीन संबंध ठेवल्यानंतर काही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. "
किरणमयी नायक एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी एक विचित्र सल्लाही यावेळी दिला आहे. त्या म्हणाल्या की, "माझा सल्ला आहे की, जर तुम्ही अल्पवयीन असाल तर कोणत्याही फिल्मी रोमान्सच्या जाळ्यात अडकू नका. तुमचं कुटुंब, मित्र आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं. आजच्या काळात वयाच्या 18 व्या वर्षी लग्न होताना दिसत आहेत. काही वर्षांनी जेव्हा मुलं होतात, त्यानंतर जोडप्यांना एकत्र राहणं अवघड होतं. "
"सहमतीने संबंध ठेवल्यानंतर जर नाते तुटल्यानंतरच्या बहुतांश घटना आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप संपते तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. जास्तीत जास्त कौटुंबिक वाद सोडण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला आणि पुरूषांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे." असेही नायक म्हणाल्या.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस