“अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करुन घेणारे आंदोलक यापूर्वी देशाने कधी पाहिले नाहीत” : प्रवीण दरेकर
मुंबई : मागील महिन्याभरापासून दिल्लीच्या सीमेजवळ केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये दलाल, भांडवलदार आणि अडत्यांचा समावेश असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर अक्रोड-पिस्ते खाणारे, मशिनने मसाज करुन घेणारे आंदोलक यापूर्वी देशाने कधी पाहिले नसल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.
दरेकर यांनी शुक्रवारी रयत क्रांती संघटना व भाजपा किसान मोर्चातर्फे चंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आत्मनिर्भर किसान यात्रेच्या निमित्ताने सभेत दिलेल्या भाषणामधुन शेट्टींवर निशाणा साधल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा शेतकऱ्यांचे नेते म्हणविणारे राजू शेट्टी यांनी करू नये. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहूसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये व बागायतीसाठी ५० हजार रुपये देण्याच्या वचनाचे काय झाले. शेतकऱ्यांना चिंतामुक्त व कर्जमुक्त करण्याच्या वचनाचे काय झाले याचेही उत्तर जनतेला द्या, असा सणसणीत टोला दरेकर यांनी शेट्टी यांना लगावला.
ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या पायातील बेडय़ा निघतील, त्या दिवशी शेतकरी सुखी होईल, असे शरद जोशी नेहमी सांगायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच धोरण अवलंबिले असल्याचे नमूद करून दरेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गोष्टी आम्हाला करतात, पण अख्खा भाजप बांधावर जाऊन संवाद साधत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जायची भीती आम्हाला नाही, शेतकरी आमचा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जे गेले होते व नंतर आपलेच वचन विसरले, त्यांना आधी विचारा असा सवाल दरेकर यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज