महिलांसाठी हिंसाचारमुक्त वातावरण निर्माण करण्याची सर्वांची जबाबदारी : अॅड राजेश्वरी केदार ; डॉ. आंबेडकर शेतीविकास व संशोधन संस्थेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला : देशात सर्वत्र महिला अत्याचार प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच बरोबर महिलांच्या अधिकाराचे उल्लंघन सर्वत्र होत आहे. महिला हिंसामुक्त वातावरण व महिलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अॅड राजेश्वरी केदार यांनी मांडले. त्या डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी गट विकास अधिकारी संतोष राऊत, सभापती राणीताई कोळवले, माजी सभापती श्रुतिका लवटे, संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण, महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी आसमा आतार, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, प्राध्यापक डॉ.सीमा गायकवाड, माजी उपनगराध्यक्षा स्वाती मगर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, खंडू सातपुते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक कायदे अस्तित्वात आणले आहेत. तरीही महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार होताना दिसत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी पुढाकार घेतला तर कायद्याचा धाक बसेल व होणारे अत्याचार कमी होतील.
गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले, महिलांच्या समोर अनेक अडचणी आहेत, समाज व कुटुंबाच्या पातळीवर महिला सुरक्षित कशा राहतील यासाठी सर्वांनी समानतेच्या मूल्याचा पुरस्कार व जाणीव जागृती केली पाहिजे.
यावेळी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या विविध कायद्याची माहिती दिली व तसेच जुन्या चालीरिती व परंपरा यामधून महिला वर्गानी बाहेर येऊन त्यांच्या अधिकाराची लढाई लढली पाहिजे असे सांगितले. या महिला मेळाव्यात बालविकास प्रकल्प अधिकारी आसमा आतार, प्रा. सीमा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे, माजी सभापती श्रुतिका लवटे, स्वातीताई मगर, संरक्षण अधिकारी चव्हाण, गोरक्ष गुरव आदींनी मनोगते मांडली. या महिला मेळाव्याचे प्रास्ताविक कल्पना मोहिते व सूत्रसंचालन शर्मिला केदार यांनी केले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज