कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाच्या स्थगिती निर्णयाबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा न्यायालयांना सल्ला
मुंबई : कांजूरमार्ग येथील मुंबई मेट्रोच्या कारशेडवरून सध्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, काल मुंबई हायकोर्टाने कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे.
आता कोर्टाच्या या निर्णयाबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांच्या राजकारणात कोर्टाने पडू नये, असा सल्ला राऊत यांनी न्यायालयांना दिला आहे. तसेच यंत्रणांना हाताशी धरून विकासकामांना खिळ घालण्याचे आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कांजूरमार्ग येथील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, सध्या कुठल्याही कामात कोर्टाचा हस्तक्षेप सुरू आहे. कोर्टाने प्रलंबित खटल्यांकडे लक्ष दिले पाहिजे. विरोधकांच्या राजकारणात कोर्टाने पडू नये. कांजूरमार्ग कारशेडबाबत दिलेला निर्णय दुर्दैवी आहे.
ही जमीन महाराष्ट्राची आहे. सरकार महाराष्ट्राचे आहे. मेट्रो कारशेड हा राज्याच्या, देशाच्या विकासाचा विषय आहे. कांजूरमार्गच्या त्या जागेवर बंगले बांधले जाणार नाहीत, असेही राऊत पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांनी अहंकारावरून केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. अहंकाराची व्याख्या तपासून पाहावी लागेल. आरेमधील जंगल वाचवण्यामध्ये कसला अहंकार आहे, असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज