“लोकप्रतिनिधी असताना शेतकऱ्यांबाबत असे वक्तव्य चुकीचे” : नवनीत राणा
मुंबई : पंजाब आणि हरियाणासह दिल्लीत शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता "काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष शेतकऱ्यांना समोर करून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला निशाणा साधत आहेत," असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय.
"जर कृषी कायद्यांवर बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ या राज्यांमध्ये शेतकरी या कायद्याचं चांगलं स्वागत करतोय. जर महाराष्ट्रातील शेतकरी शांत बसलेत, तर त्यांना हा कायदा आवडतोय. शेतकऱ्यांना या कायद्यातून स्वातंत्र्य दिलं," असं म्हणत नवनीत राणा यांनी नव्या कृषी कायद्याचं समर्थन देखील केलं आहे.
यावेळी नवनीत राणा यांनी रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. "आपण एक जबाबदार व्यक्ती असताना, लोकप्रतिनिधी असताना शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य करायला नको. चीन-पाकिस्तानबाबत तुलना मन दुखावणारी आहे. त्यांनी कुठल्या पक्षावर निशाणा केला असेल, पण कुठल्या शेतकऱ्यावर बोलले असतील तर ते चुकीचे आहे.. शेतकऱ्यांची भावना आपण कधीच दुखावली नाही पाहिजे," असं राणा म्हणाल्या.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज