आश्चर्यजनक आरोप : ‘कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात’
जालना : केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय तुम्हाला तुमचा माल कुठेही नेऊन विकण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला बाजार समितीचा आठ टक्के कर भरण्याची गरज नाही. पण या चांगल्या निर्णयाला देखील विरोध केला जात असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आश्चर्यजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करत आहे.गरीबांच्या पोटाला धान्य मिळावे म्हणून १ लाख ७५ हजार कोटींची सबसिडी देऊन दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये दराने तांदुळ दिला जात आहे. या शिवाय नव्या कायद्यात शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात कुठेही नेऊन विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. पण आंदोनलात सहभागी असलेल्या सुटाबुटातील लोकांना हे मान्य नाही.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान या बाहेरच्या देशांचा हात आहे. या आधी देशात सीसीए आणि एनआरसीचा कायदा करण्याचा निर्णय झाला, तेव्हा देखील या देशातील मुसलमांनाना देशाबाहेर जावे लागेल,अशी भिती निर्माण करण्यात आली. पण एका तरी मुसलमानाला देश सोडून जावे लागले का? असा सवाल दानवे यांनी केला.
केंद्रातील मोदी सरकारने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले त्यामुळे मका, सोयाबीन या पिकांना कधी नव्हे तो चांगला भाव मिळू लागला आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सगळा गहू केंद्र सरकार हमी भावने खरेदी करते. पण नव्या कृषी कायद्यामुळे आता सरकार आपला गहू खरेदी करणार नाही, असा गैरसमज झाल्यामुळेच या भागातील शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण सरकारने यापुढे देखील सरकारी खरेदी सुरूच राहणार असून, ती देखील हमीभावाने केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन चुकीचे असल्याचेही दानवे यांनी यावेळी सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज