“त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये’ : दरेकर
चिपळूण : चिपळूण दौऱ्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपची कृषी कायदा व कोकण विकासाबाबत भूमिका मांडली. राज्यातील आघाडी सरकार, शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर दरेकर यांनी टीका केली.
दरेकर म्हणाले, ‘‘केंद्राने आणलेल्या कृषी विद्येयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणूनबुजून गैरसमज पसरवले जात असून प्रत्यक्षात हा कृषी कायदा शेतकऱ्याच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे अपयशी सरकार असून प्रत्येक क्षेत्रात हे सरकार निष्फळ ठरले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी पुन्हा येईन, परत जाईन या विषयावर बोलूच नये. कारण राजकारणात येणे जाणे ही प्रक्रिया नेहमीच सुरू असते आणि स्वतः अजितदादांनी ते आपल्या भूमिकेने दाखवून दिले आहे, असे सांगून दरेकर यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिल्याची चर्चा होती. संजय राऊत हे केंद्र आणि राज्य असा वाद तेवत ठेवण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. ही त्यांची भूमिका दुर्दैवी असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये, असेही दरेकर म्हणाले.
या पुढे भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा दरेकर यांनी केली. कोकणातील ग्राम पंचायत आणि पालिका निवडणुका स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल आणि या निवडणुकांमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज