“त्यावेळी माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता, मी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार” : चंद्रकांत पाटील
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सामनाच्या संपादकीयमधून काही दिवसांपूर्वी निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त मी गेलो होतो. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असे मी त्यावेळी म्हटले होते. सामनाने त्यावेळी माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. मी रश्मी ठाकरे यांना या विषयी एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावाने लागतो, असे पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर ज्या प्रकारची भाषा त्यांनी वापरली, ती भाषा रश्मी ठाकरे या संपादिका असलेले संपादकीय असूच शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज