“एकदा कोरोना झाला की पुन्हा होणारच नाही या भ्रमात राहू नका” : उपमुख्यमंत्र्यांनी दिला लॉकडाऊन बाबत मोठा इशारा
मुंबई : बारामती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन बाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले, कोरोना पळून गेल्यासारखे लोक वावरत आहेत. मास्क, सॅनिटाईझरचा वापर न करणे, फिजिकल डिस्टंन्स् चे नियम न पाळणे, गर्दीबाबत दिलेल्या नियमांचे पालन न करणे आदी घटना सर्रास घडत आहेत. एकदा कोरोना झाला की पुन्हा होणारच नाही या भ्रमात राहू नका. दोन, तीनदा कोरोना झाल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुन्हा काही कठोर निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतील.
जानेवारीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र नंतरच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याला आळा घालायचा असेल तर सर्वच नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक बनले आहे. यापुढे कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी पवार यांनी उपविभागिय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना बारामतीमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या. रविवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दंडाची रचना ठरवणार आहे. कारवाईची वेळ येऊ देऊ नका.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस