आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला केले कळकळीचं आवाहन
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या स्वतः कोरोनाविरुद्ध लढाई देत आहेत. राजेश टोपे रुग्णालयात असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचं संकट घोंगावू लागलं आहे. मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये करोनाचा उद्रेक होताना दिसत असून, कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्यानं होत असल्यानं राज्य सरकारकडून पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात आहे. मात्र, पुन्हा लॉकडाउनचं संकट ओढवून नये, यासाठी टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
कोरोना आणि लॉकडाउनचं संकट ओढवण्याची शक्यता असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राच्या जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. “गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक करोना योद्धे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे. मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतोय. गेल्या वर्षभरापासून विषाणू माझा पाठलाग करत होता. मी राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोना हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु कोरोनाला माझ्याजवळ येणं जमलं नाही, पण अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सद्बावना, प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढातईत सहभागी होणार आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.
“समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाउन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाउन परवडणार नाही. लॉकडाउन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाउन टाळा. शेवटी स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबातील प्रिय व्यक्तींची काळजी, प्रिय व्यक्तींची काळजी म्हणजेच समाजाची काळजी. तेव्हा चला तर हरवूया कोरोनाला. एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने,” असं आवाहन टोपे यांनी महाराष्ट्राला केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस