“आता जो कोरोना वाढत आहे, त्याची जबाबदारी राज्यातील विरोधक घेणार आहेत काय?” : शिवसेना
मुंबई : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कोरोनाचे संकट पाहता रयतेवर कठोर निर्बंध लावले असते, हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे,' असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात लगावण्यात आला आहे.
'राजकीय मेळावे, लग्न समारंभ तसेच बहुतेक सर्वत्र लोकं मास्क लावत नाहीत की सुरक्षित अंतर ठेवताना दिसत नाहीत. लोक बेपर्वा का आहेत? परिस्थिती अशीच राहिली तर कोरोनाची लाट नव्हे, तर लाटा येतील असा इशारा कोरोनासंदर्भातील राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे. निदान डॉक्टरांचे तरी ऐका!' असं मत या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील देशांनी कोरोना लसीची 10 लाखांची खेप हिंदुस्थानला परत पाठविल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. बहुदा तिकडला कोरोना जरा आडदांड आहे, लसीने तो मरणार नाही असेच एकंदरीत दिसते. महाराष्ट्रातही आता सरकारने आडदांडपणे वागावे, नाहीतर कोरोना पुन्हा हाहाकार माजवेल.' अशी सूचना या अग्रलेखात करण्यात आली आहे.
'हे उघडा आणि ते उघडा, नाहीतर आंदोलने करू,' अशा धमक्या विरोधक देत राहिले, कोरोना नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला व राज्याला बसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत होती. मात्र त्यामुळे नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. नागरिकांचा बेजबाबदारपणा पुन्हा सुरू झाला. त्या बेजबाबदारपणास विरोधकांनी इतके खतपाणी घातले की, सरकारलाच जणू खलनायक केले. आता जो कोरोना वाढत आहे, त्याची जबाबदारी राज्यातील विरोधक घेणार आहेत काय?, असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस