‘उलट त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे मोदींना राजधर्माचा धडा शिकवत होते’ : मंत्री नवाब मलिक यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडताना मलिक यांनी त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजधर्म पाळण्याच्या सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय त्यावेळी एकमताने झाला होता. त्यात नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता. उलट त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी हे मोदींना राजधर्माचा धडा शिकवत होते, अशा शब्दात नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून राज्यसरकार कशी काळजी घेत आहे यावर देखील नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे. आम्ही उद्यापासून जनता दरबार रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. ही माहिती देताना त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय कार्यक्रम घेतले जात असल्याचे ते म्हणाले. लॉकडाउन सुरू असताना हे उघडा, ते उघडा असे विरोधक मागणी करत होते याचीही त्यांनी आठवण करून दिली. आता मात्र विरोधक उलटा आरोप करत असल्याचे ते म्हणाले.
नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. लसीकरणानंतर सीएए कायदा लागू करण्यात येईल असे अमित शहा सांगत आहेत. मात्र लसीकरणाची गती अतिशय धिमी असून हे पाहता हा कार्यक्रम आणखी ५ वर्षे चालेल, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक असल्याने अमित शहा अशी वक्तव्ये करत असल्याचे ते म्हणाले. लसीकरण संपेपर्यंत मोदी सरकार टीकणार नसल्याचे ते म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस