“रोहित पवारांचं धोरण म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार” : पडळकर
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात असल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी ये पब्लिक है, सब जानती है, या शिर्षकाखाली एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून पडळकरांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली आहे. सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं, अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.
वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठाने १ कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली. पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे ‘पई पाव्हण्यांचं सरकार’ याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय, असा दावाही त्यांनी केला आहे.
पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करुन आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावलीये. स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलंय. आणि त्यांना समितीवर घेतल्या घेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का?, असा सवालही त्यांनी केला.
मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते, राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख यांचं नाव या समितीत सर्वात वर असायला हवे होते. देशमुख यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केल. त्यांच नाव ७ नंबरला टाकून नेमक तुम्हाला काय साध्य करायच होत? मंत्री उदय सामंत यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत?, असा सवालही त्यांनी केला.
रोहित पवारांचं धोरण म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उधार’… आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड? जिथं जिथं अहिल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येतायेत. हे कालच्या जेजूरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे. समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय, असं सांगतानाच पण एक लक्षात ठेवा… आता, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही…अशी टीकाही त्यांनी केली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस