आटपाडी : आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती उस्मान नबी शेख यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागाचे ते प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते.
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या उस्मान नबी शेख यांचे घरनिकीतल्या प्राथमिक शिक्षणानंतर B A L L B पर्यतचे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले. अतिशय धनाढ्य, सुखवस्तू ,सुसंस्कृत ,प्रगत कुटुंबात वाढलेल्या उस्मान नबी शेख साहेबांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईत समाजवादी पक्षातून केली. तिथे चांगले राजकीय बस्तान बसू लागले असतानाच आई आणि मातृभूमीतील लोकांच्या आग्रहाखातर ते आटपाडी तालुक्यात परतले. १९६० च्या दरम्यान आटपाडी कडे आलेल्या शेख साहेबांनी प्रथमतः घरनिकी या आपल्या गावची अभेद्य एकजूट करण्यात मोलाची भूमिका बजावली. गावातल्या विविध संस्था सतत बिनविरोध करण्यात ते यशस्वी झाले.
पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, तालुका स्तरावरील विविध संस्थाची पदे, पक्षीय पातळीवरचे पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले. नागनाथआण्णा नायकवडींच्या सांगली ,सातारा ,सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांच्या लोकलढ्याचे ,पाणी परिषदेचे , शेख साहेब बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस