मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणणारे तराळ-अंतराळ कार ‘शंकरराव खरात’ यांचा आज दिनांक ०९ एप्रिल रोजी स्मृतिदिन
आटपाडी : मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, आटपाडी गावाचे सुपुत्र शंकरराव खरात यांचा जन्म आटपाडी येथे झाला. `तराळ-अंतराळ' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले. `मी स्वत: महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा शिष्य आहे` असे ते नेहमी म्हणत.
१९५७ साली त्यांची नवयुग दिवाळी अंकात, वयाच्या पस्तीसाव्या वर्षी `सत्तूची पडीक जमीन` नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. त्यांनतर रामा महार, बंडा मांग अशा बलुतेदारांच्या बारा कथा त्यांनी नवयुगमध्येच लिहिल्या. १९५७-५८ मध्ये शंकरराव खरातांची `माणुसकीची हाक' ही महार बलुतेदारावर लिहिलेली कादंबरी गाजली. त्यामुळे ते पुढे लेखक म्हणून उदयाला आले. साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले.
शंकरराव खरात यांचा जन्म ११ जुलै १९२१ ला सांगली जिल्ह्यातील आटपाडी इथे झाला. तिथल्या महारवाड्यात त्यांचं बालपण गेलं. समाजाने अस्पृश्य ठरवल्यानंतर वाट्याला येणारं दु:ख काय व कसं असतं याचा पदोपदी आलेला आणि हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी घेतला. त्यासाठी शिक्षणाने त्यांना साथ दिली. शिक्षणाने नवा विचार त्यांच्या मनात रुजवला आणि तो फुलवत ठेवला. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली धर्मांतराची हाक दलितांमध्ये विचार पेरणारी आणि प्रभाव पाडणारी होती.
१९८४ ला जळगाव इथे भरलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांचे, सोहळ्यांचे ते धनी ठरले. ९ एप्रिल २००१ ला वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झाले.
- कथासंग्रह
- बारा बलुतेदार (सन १९५९)
- तडीपार (सन १९६१)
- सांगावा (सन १९६२)
- टिटवीचा फेरा (सन १९६३)
- सुटका (सन १९६४)
- दौण्डी ( सन १९६५)
- आडगावचे पाणी आणि गावशीव (सन १९७०)
- कांदबरी
- हातभट्टी (सन १९७०)
- गावचा टिनोपाल गुरुजी (सन १९७१)
- झोपडपट्टी (सन १९७३)
- मसालेदार गेस्ट हाऊस (सन १९७४)
- फुटपाथ नं. १ (सन १९८०)
- माझं नाव (सन १९८७)
- आत्मचरित्र
- तराळ अंतराळ (सन १९८१)
१९८१ मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र मराठी साहित्यविश्वातील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून गणलं गेले
याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात (१९६१), डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर (१९६६), डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा (१९९०) ही त्यांची पुस्तकंही उल्लेखनीय ठरली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस