बारामती : स्वतःच्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला मोठ्या फरकाने पराभूत झाला. त्यामुळे बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे अनामत जप्त केले, हा विषय शिळा झाला. निवडणूकी आधी अवघ्या 15 दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवारांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्या आटपाडी मतदारसंघात एवढ्या कमी कालावधीत निवडणूक लढवली तर त्यांचेही अनामत रक्कम जप्त होईल अशी टीका भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली.
घोंगडी बैठकाच्या निमित्ताने बारामती दौऱ्यावर असलेल्या पडळकरांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार वारंवार बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाल्याचे सांगत आहेत. बारामतीत डिपॉझिट जप्त झाले ही मी मान्यच केले आहे. परंतु माझ्याविषयी बोलण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही. त्यांनी अनेकदा माझे कुठे काय सापडतेय का, कशात अडकतोय का याची चाचपणी केली. परंतु मी कशातच अडकत नाही हे लक्षात आल्याने ते जुनेच मुद्दे उकरून काढत आहेत. त्यांच्या सोशल मिडियाच्या दुकानातील पोरांना माझ्याशिवाय दुसरे काहीच मटेरियल नाही.
काँग्रेससचे राज्यातील मंत्री सत्तेसाठी लाचार झाले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हान पडळकर यांनी दिले. त्यांचे मंत्री जी विधाने करतात, त्याच्या विरोधी भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते. मंत्री नितीन राऊत यांच्या प्रकरणात अजित पवार यांच्याकडून हे घडले. त्यामुळे काँग्रेसचे सरकारमध्ये काही चालत नाही. काका-पुतण्यांपुढे त्यांना किंमत नाही. गृहमंत्र्यांचा विषय आला, तर कामगार मंत्री बोलतो. शिक्षण खात्याचा विषय आला तर महसूलमंत्री बोलतो. आरोग्यमंत्र्याचा विषय आला तर अर्थमंत्री बोलतो. अर्थमंत्र्याचा विषय आला तर खासदार बोलतो, असा सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. सरकारमध्ये चर्चा नाही, समन्वय नाही. वसूलीसाठी, खाबुगिरीसाठी सरकार चालवितात. मुख्यमंत्री कमी बोलतात आणि बाजूचे लोक जास्त बोलतात अशी टीका पडळकर यांनी केली. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे पहिल्यापासून काम करत आहेत. ते भाजपचे म्हणून नव्हे तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचेही पडळकर म्हणाले.