सांगली : पोलीस दलात कर्त्यव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नियुक्ती दिल्याने पोलीसांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढेल. पोलीस दलामध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे जगण्याची नवी उमेद निर्माण होईल आणि त्यांचे कुटुंब सावरेल असा विश्वास मला वाटतो. सांगली पोलीस दलाने अनुकंपा तत्वावर तात्काळ नियुक्ती देऊन तसेच चोरीला गेलेला मुद्देमालाचा कमी कालावधीत छडा लाऊन संबधितांना किंमती मुद्देमाल परत केला. त्यामुळे सांगली पोलीस दलाची प्रतीमा उंचावली असून जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. असे गौरवउद्गार पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.
सांगली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने अनुकंपा तत्वावर पोलीस पाल्यांना नियुक्ती प्रदान व चोरीस गेलेला किंमती मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबामध्ये अडचणी निर्माण होतात. अशा कठीण प्रसंगी त्याच्या पाल्याला वडीलांच्या जागेवर अनुकंपाने नियुक्ती मिळाल्यास ते कुटुंब अडचणीतून सावरेल. पोलीस दलाने केलेले हे काम अतिशय महत्वाचे काम आहे. अशा गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झाले तर पोलीस दलाचे मनोधैर्य कमी होऊ शकते त्यामुळे हा कार्यक्रम फार महत्वाचा आहे. अनुकंपा तत्वावर ज्या पोलीस पाल्यांना किंवा कटुंबातील व्यक्तींना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या सर्वांना पुढचे शिक्षण घेऊन पुढील पदावर जाऊन काम करता येईल. पोलीस दलामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे जगण्याची नवी उमेद त्यांच्यात निर्माण होईल आणि आपण आपलं कुटुंब सावराल असा विश्वास वाटतो. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पोलीस पाल्यांना अनुकंपा तत्वाची प्रक्रिया तातडीने राबवून संबधित उमेदवारांना याबद्दल मी पोलीस अधिक्षकांचे अभिनंदन करतो.
पोलीस प्रशासनाने राबविलेला दुसरा उपक्रमही महत्वाचा असून चोरी झाल्यानंतर त्या व्यक्तीचे सगळे जिन्नस जसा तपास लागेल तसा मिळाल्यावर त्यांना सुपुर्द करणे यालाही बराच काळ लागतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करुन जेवढे साहित्य मिळाले आहे तो परत करण्याचा कार्यक्रम घेतला. पोलीस दलाला स्वत:च्या कामाविषयी पारदर्शकता व आत्मविश्वास आहे. अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी मुद्देमालासह जे सापडले ते पुन्हा ज्यांचे आहे त्यांच्याकडे सुपुर्द करुन सामान्य माणसाचा पोलीसाबद्दल असलेला विश्वास द्विगुणीत केला आहे. असे कार्यक्रम 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये आयोजित करावे. त्यामुळे जर 4 ते 6 महिन्यांनी जिन्नस परत करण्याचे कार्यक्रम होतील. पोलीस दलाच्यावतीने जो मुद्देमाल जाप्त करुन परत देण्यात आला त्यामध्ये 19 तोळे सोने, 1 किलो 730 ग्रॅम चांदी, 5 लाख 46 हजार रोख रक्कम असा 14 लाख 61 हजार 157 रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आले. या वस्तुंची किमत किती आहे त्यापेक्षा आपली हरवलेली वस्तु परत मिळाल्याचा अनंद जास्त असतो. आणि तो अनंद आज पोलीस दलाने त्या व्यक्तींना दिला. त्यामुळे पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधिक्षक व जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो.
पोलीस दलाला सापडलेली 275 दुचाकी, 13 तीनचाकी, 11 चारचाकी व 1 सहाचाकी अशा 300 बेवारस वाहनांचा जाहीर निलाव करुन 12 लाख 10 हजार रुपये शासन जमा केली आहे. रेकॉर्डचे अद्यावतीकरण केले, मुद्देमाल निर्गतीकरण पोलीस दलाने केले. असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधुन 25 चारचाकी व 50 दुचाकी उपलब्ध करुन दिली. तसेच सांगली महापालिका, विटा, इस्लामपूर या ठिकाणी सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलात अनुकंपा तत्वाद्वारे आठ पाल्यांना नियुक्तीपत्र व ज्यांची चोरी झाली आहे त्या मुळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत देण्यात आला आहे.