मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात बोलताना खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसचं नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या संकटाच्या काळात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून गंभीरपणे काम केलं पाहिजे. अशा परिस्थितीत कुणी स्वबळावर निवडणुका लढू असं म्हणत असेल तर लोक जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत,' असं सूचक वक्तव्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर काँग्रेसमध्येही स्वबळाच्या भूमिकेबाबत मतभेद असल्याचं पुढं आलं होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी सावध मत व्यक्त केलं. 'उ्द्धव ठाकरे हे काल मुख्यमंत्री नव्हे तर पक्षप्रमुख म्हणून बोलले. स्वबळाची भाषा शिवसेना सुद्धा करते. त्यामुळं मुख्यमंत्री नेमकं कोणाला उद्देशून बोलले हे कळलं तर त्यावर बोलता येईल,' 'काँग्रेस पक्ष हा पाच वर्षे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेल. तसा शब्द खुद्द सोनिया गांधी यांनी दिला आहे,' असं पटोले यांनी सांगितलं.
पटोले यांनी यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. 'काँग्रेसनं साठ वर्षात केलेलं काम मोडीत काढण्याचं काम मोदी सरकारनं केलं. नोटाबंदी, जीएसटीनं देश देशोधडीला लागला. हजारो लोकांना रांगेतच मरावं लागलं. करोना काळात लोकांना घरात ठेवले आणि देश विकून टाकला. लसनिर्मितीचं काम खासगी कंपन्यांना दिलं. देशात लस न देता पुलवामावर हल्ला केलेल्या पाकिस्तानला दिली. केंद्रातल्या दोन्ही दाढीवाल्यांचं दुकान आपल्याला बंद करायचं आहे,' असा टोला पटोले यांनी यावेळी मारला आहे.