मुंबई : आज शिवसेनेचा ५५वा वर्धापन दिन आहे.यानिमिताने बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारले आहे. निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत. ते नुसतेच बोलतात. ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली होती. त्यांना माहीतच असेल, असं सांगतानाच आपण कोणामुळे मोठे झालो हे ते विसरले असतील. बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका, असा सल्लाही खैरे यांनी दिला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे आपण कोरोना संकटावर मात केली आहे. आता कोरोनच्या संकट काळात त्यांनी केलेल्या कामामुळे जनता फिरू शकत आहे. मी मराठवाड्यात दौरे करतो. त्यावेळी जनता उद्धव ठाकरेंचं कौतुक करताना दिसते. विरोधी पक्ष नेते काही बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. पण कोरोनामध्ये जनतेला वाचवण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, असं ते म्हणाले.
आम्ही कधीही हिंदुत्व विसरत नाही. आमचे हिंदुत्वाचे कार्यक्रम चालू आहेत. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आम्ही कधीही हिंदुत्व सोडणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वाबद्दलचं मार्गदर्शन आणि त्यांचं वाक्य आमच्या मनावर कोरलं आहे, असं सांगतानाच मी शिवसेनेच्या तिसऱ्या पिढीसोबत काम करत आहे. बाळासाहेबांचे बाळकडूचे आमच्यावर संस्कार झाले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.